October 18, 2013

तरुण गुंतवणूकदारांनो, या चुका टाळा

budget
 
तरुणांना संपत्तीसंचय करायचा असेल तर सुरुवातीपासूनच आर्थिक बाबतीत योग्य त्या सवयी लावून घेतलेल्या बऱ्या. आयुष्यात पुढे उपयोगी पडतील ,अशा आर्थिक सवयी त्यांनी रुजवाव्यात याविषयी सांगत आहेत उमा शशिकांत 
.... 

कमवायला लागलेले आणि त्याबाबत समाधानी असलेले अनेक तरुण आर्थिक बाबी किंवा गुंतवणूक याकडे फारसे गांभिर्याने बघत नाहीत. पुरेसे पैसे नाहीत पर्यायांचे जंजाळ आहे हा विषयच क्लिष्ट आहे कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही किती कागदपत्र सांभाळावी लागतात... अशी अनेक कारणे ते पुढे करतात. पैशांचा फारसा विचार न करता येईल तसे आयुष्य जगण्याची सवय काही तरुण मंडळींची असते. या मंडळींनी आर्थिक बाबतीत पुढील चुका कटाक्षाने टाळाव्यात आणि काही गोष्टी आवर्जून कराव्यात. 

* एक 
कमावत्या असंख्य तरुणांना आर्थिक नियोजन किचकट वाटते आणि हा विषय त्यांच्यासाठी नसल्याचे वाटते. कमवायला सुरुवात केल्यावर पैशांबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत. पर्सनल फायनान्ससाठीचा सोपा उपाय म्हणजे स्वतःला उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता समजावे. तुम्ही बचत व गुंतवणूक केली तर उत्पन्न बाजूला सुरक्षित राहील. तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केला तर अधिक कमवावे लागेल वा उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागतील. तुम्ही कर्ज घेतले तर जबाबदारी वाढेल आणि भविष्यातील उत्पन्न परतफेडीमध्ये जाईल. पर्सनल फायनान्स या संकल्पनांमध्येच सामावलेले आहे. याच संदर्भातून आपल्या सगळ्या आर्थिक निर्णयांकडे पाहावे. 

* दोन 
आपल्या सुरक्षित कोषामधून बाहेर पडावे लागले तर काही तरुण मंडळी तक्रार करतात. यामुळे त्यांचे आयुष्य किती कटकटीचे झाले आहे हे आळवत बसतात आणि यावर उपाय शोधण्यावर मात्र कमी वेळ खर्च करतात. मुलांचे गरजेहून अधिक संरक्षण करणारे पालक मुलांच्या संगोपनामध्ये अडचणी ‌निर्माण करतात. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत कृती करणे गरजेचे असते. अभ्यासात अवघड प्रश्न सोडवणारी मुले तोच दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात ठेवतातच असे नाही. भूक लागल्यावर दोन मिनिटांत मॅगी बनवण्याचा झटपट पर्याय त्यांना आर्थिक बाबतीतही हवा असतो. तरुणांनी हा दृष्टिकोन बदलायला हवा आणि आर्थिक निर्णयांच्या बाबतीत दिशाहीन होणे सोडून द्यावे. 

* तीन 
आर्थिक बाबतीत चालढकल करणे हा बेजबाबदारपणा आहे. बँक स्टेटमेंट नसलेले डिव्हिडंड चेक न भरलेले ,टॅक्स रिटर्न्स न भरलेले तसेच म्युच्युअल फंड वा ब्रोकरकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले असंख्य तरुण आढळतील. कंपनीचा आग्रह असतो म्हणून त्यांच्याकडे पॅनकार्ड तरी असते. गंमत म्हणून शेअरचे व्यवहार करणारेही अल्पकालीन भांडवली नफा कमावतात आणि तो करपात्र असतो. हा कर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. आपण पकडलेच जाणार नाही असा विचार करणे चुकीचे आहे. एका खोक्यामध्ये स्टेटमेंट ,बिले कागदपत्रे व नोटिसा ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा त्याचे वर्गीकरण करावे. वेळेवर कर भरावा. या सवयी वेळेवर व लवकर रुजवल्या तर पुढील वाटचालीत मदत होईल. 

* चार 
काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत ,असे भविष्यात कोणतेच संकट त्यांना दिसत नसल्याने ते सढळ हाताने खर्च करतात. खर्च केल्यानंतर हातात उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा आधीच पैसे वेगळे काढून ठेवलेले बरे. सॅलरी अकाउंटमधून थेट पैसे वळते करण्याचा पर्याय असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे पैसे नियमितपणे गुंतवले जातात आणि बचत खात्यात विशिष्ट रक्कम जमा झाली की त्याचे रूपांतर ठेवींमध्ये केले जाते या पर्यायांमुळे शिस्तबद्ध बचत होऊ शकते. 

* पाच 
तरुण गुंतवणूकदार अतिशय टेक-सॅव्ही असतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आर्थिक बाबींसाठी कसा करून घ्यायचा याचा विचार त्यांनी करावा. क्रेडिट ब्युरो शैक्षणिक कर्जांच्या परतफेडीच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरू शकतात याकडे दुर्लक्ष केल्याने शैक्षणिक कर्जांच्या बाबतीत चुकारपणा दिसून येतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड योग्य प्रकारे न केल्याने नंतर होमलोन नाकारले जाते तेव्हा चूक सुधारण्यासाठी फार उशीर झालेला असतो. कोअर बँकिंग सुविधेमुळे प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता इंटरनेट व मोबाइल बँकिंगमार्फत बरेचसे व्यवहार करता येतात. बजेट बनवणे खर्चाचे नियोजन गुंतवणुकीचे निर्णय ,नोंदी ठेवणे अशा गोष्टींसाठी सोयीची अॅप्लिकेशन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा तरुणांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ व ‌अधिक सक्षम होतील. 

* सहा 
अनेक तरुण चुकीच्या पर्यायाने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आयपीओमध्ये पैसे ओतणे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार करणे म्हणजे पैसे कमावण्याचा सोपा मार्ग असल्याचे त्यांना वाटते. विविध मॅनेजमेंट स्कूलमध्ये शेअर व डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग गेम असतात पण अॅसेट अॅलोकेशनवर गेम नसतात. पण अॅसेट अॅलोकेशन कंटाळवाणे वाटले तरी अत्यंत गरजेचे आहे. मुदतठेवी व पीपीएफ खाते अशा सोप्या पर्यायांमार्फत संपत्तीनिर्मिती करण्याचा पाया रचावा. नंतर डायव्हर्सिफाइड लार्ज-कॅप म्युच्युअल फंड व बाँडचा समावेश यामध्ये करता येईल. त्यानंतर शेअर्सचा समावेश करावा. तरुण गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम पाया मजबूत करायला हवा. 

वेळ ही तरुण गुंतवणूकदारांची जमेची बाजू असते. गुंतवणुकीचे योग्य निर्णय वेळीच घेतले तर त्यांना लक्षणीय संपत्तीची निर्मिती करणे शक्य होऊ शकते. चालढकल आणि दुर्लक्ष यामुळे ही संधी हातची घालवू नये. 
 
साभार: म.टा.

September 13, 2013

खव्वयांसाठी....मुंबई, ठाणे, चिपळुण, रत्नागिरी....पुणे मधील हॉटेलांची यादी

मुंबई

१. समर्थ भोजनालयः गिरगाव [मासे]

पत्ता: बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते.

२. कोकण्यांची खानावळ

पत्ता: HOTEL HIGHWAY GOMANTAK

44/2179, Gandhi Nagar, Behind Maratha Store, Highway Service Road, Bandra (E), Mumbai

Timings: 11:00 am to 3:30pm and 7:00pm to 10:30pm

Thursday Closed

३. सायबिण

पत्ता: दादर, सेनाभवनच्या बाजुला

४. गोमांतक

पत्ता: दादर

५. सिंधुदुर्ग

पत्ता: शिवाजी पार्क, दादर

६. क्षीरसागर

उत्तम कोंबडी-वडे आणि सागुती पुरवणारे घरगुती उपाहारगृह

पत्ता: आयकर ऑफीस जवळ, लालबाग[?]

७. जयहिंद

पत्ता: पोर्तुगि़ज चर्च च्या बरेच पुढे.

८. योगी

पत्ता: सायन

९. वैशाली

पत्ता: चेंबुर

१०. समर हारवेस्ट् व गजाली

पत्ता: विलेपार्ले पुर्व.

११. दर्या

पत्ता: विलेपार्ले पुर्व.

१२. दाराज चा धाबा

पत्ता: दहिसर चेकनाक्याजवळ.

१३. फोर्ट

महेश लंच होम [मासे]: फिरोजशा मेहेता रोड

संदीप गोमांतक [मासे]: संदीप बोराबाजार

प्रदीप गोमांतक [मासे]: गनबो स्ट्रीट

अपूर्व लंच होम [मासे]: फिरोजशा मेहेता रोड

१४. गजाली

महाग असली (~८००-८५० रू.), तरी तंदुरी क्रॅब ही डिश आवर्जून खाण्यासारखी.

पत्ता: पार्ल्याला हनुमान रोडवर आहे

१५. ग्रॅन्ट हाऊस कॅन्टीन

पत्ता: क्रॉफर्ड मार्केट, व्हीटी स्टेशनला उतरून १ नंबर फलाटाबाहेर पडून उलटे मशीदबंदरच्या दिशेने चालत या आणि कुणालाही विचारा..

१६. निलदुर्ग

खास मालवणी

पत्ता: निलदुर्ग चेंबुर-गोवंडी रोड

१७. कोकणरत्न

पत्ता: दहिसर हायवेजवळ

१८. वैभव

तिथे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज एकदम मस्त मिळते.... एवढे चविष्ट नॉनव्हेज खूप कमी ठिकाणी मी चाखले आहे.

मासे ऑर्डर करताना वेटरच विचारतो की मालवणी पद्धतीचा मासा करुन हवा आहे की दुसर्‍या?

[पण मुंबईत असलेल्यांनी तर जरुर तेथे भेट द्यावी

वेळ आणि पैसा दोन्ही सत्कारणी लागेल

घेणार्‍यांची सोय पण चांगली आहे तिथे]

टिपः शिंपले शुक्रवारी खावे. भांडूपहून पुण्याला जाण्यापूर्वी.

पत्ता: मुंबईला ऐरोलीत (भांडूपच्या अलिकडे ) वैभव नावाचे एक झकास हॉटेल आहे.

तिथे मनसेचे ऑफीसपण आहे जवळच...

सेक्टर पाच मधे येते ते

भांडूपकडून येताना पुलावरुन आला की सर्कल लागते, दुसर्‍या सिग्नल वरुन उजवीकडे गेला की मनसेचे ऐरोलीगड लागते

त्याच्या जवळच आहे ते....

१९. सत्कार

उत्तम मासे आणि भाकरी, शिवाय परवडणारे दर..

पत्ताटीळक टॉकीज मागे, डोंबिवली

**********************************************************************************************

ठाणे

१. मालवण (पांच पाखाडी)

२. फिशलॅन्ड (खोपट)

३. कोंकण दरबार (के विला)

४. दर्यासारंग (एलबीएस मार्ग, चेकनाका)

५. विजयदुर्ग (गोल्डन डाइज जंक्शन)

६. सिंधूदुर्ग - बहुधा, नक्की नाव आता आठवत नाही

पत्ता: वागळे इस्टेट, चेकनाका

७. निलम हॉटेल

सर्व प्रकारच्या मांसाहारी जेवणासाठी

पत्ता: विजयनगरी च्या जवळच घोडबंदर् रोड ठाणे.

**********************************************************************************************

चिपळूण 

१. अभिषेक

२. दिपक

चिपळुणात अभिषेकमध्ये मालवणी जेवणारा माणूस हा नेहमीच हायवेवरून ये-जा करणारा असतो. त्याला खरा कोकणातल्या जेवणाचा (मालवणी नव्हे, ती चव वेगळी!)स्वाद माहीतच नसतो. तो स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल दीपकला भेट द्या. तळलेले मासे, मच्छी करी, चिकन मसाला आणि मटण फ्राय ही देखिल येथील खासियत आहे. साधी खाणावळ वाटावी असे हे हॉटेल चवीमुळे ग्राहक राखून आहे. तांदळाची गरमागरम भाकरी आणि झणझणीत मटण एकदा चापलेत की तुम्ही तिथे जातायेता कायम थांबाल.

आणि आदरातिथ्याचे म्हणाल तर तिथे असलेला टोपीवाला वाढपी मामा तुमच्या पानातल्या वाटीमधला रस्सा तुम्ही जरा मनापासून चापताय असे वाटले तर सढळ हाताने पुन्हा आणून वाढतो. त्यासाठी टीप मिळावी अशी बिचार्‍याची अपेक्षाही नसते. आणि बिल घेताना तुमच्या चेहर्‍यावरचे समाधान टीपत मालक हसर्‍या चेहर्‍याने बिल घेतात. ज्यांची घरात सामिष भोजनाबाबत उपासमार होते असे स्थानिक ग्राहक कित्येकदा दुपारच्यावेळी येथे मटण भाकरीवर आडवा हात मारताना दिसतात.

ता.क. स्थानिक ग्राहक अभिषेकपेक्षा दीपकमध्ये जास्त असतात! सार लक्षात आले असेलच!

पत्ता: तहसीलदार कचेरीसमोर हायवेला लागून जरा आत हे हॉटेल आहे.

**********************************************************************************************

रत्नागिरी

१. हॉटेल आमंत्रण

पत्ता: एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चौकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा

२. प्रशांत लंच होम

टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो.

पत्ता: विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला आहे.

३. मारुती मंदीरला उतरल्यावर डाव्या हाताला एक/दोन चांगली हॉटेल्स आहेत. बटाटेवड्यासाठी 'खाली' १९५२ पासुनचे विहार हॉटेल.गोखले नाक्याजवळ भिडे उपहार ग्रुह. ही शाकाहारी आहेत.

४. खालच्या आळीतल्या विहार लॉज जवळची सतीशकाकाची खाणावळ्..तिचं नाव कधीच नाही विचाराची वेळ नाही आली. पण "सतिश खानोलकराची खाणावळ" असं तिथे जाऊन विचारता येईल. (मला वाटतं प्रशांत लंच होम आहे नाव्..पण गॅरेंटी नाही ) ताजं फडफडीत पापलेट खावं तर इथेच.

**********************************************************************************************

कोल्हापुर

१. वामन गेस्ट हाऊस

मालवणी पद्धतीचे जेवण, मोरी मटण मिळते [मोरी मटण म्हणजे शॊर्क माशाची एक जात असते त्यापासून तयार केली जाणारी डीश. ही मालवणी खासियत आहे. ज्याने मोरी मटण खाल्लेले नाही त्याने खरे मालवणी मत्य्स्याहारी भोजन केलेलेच नाही असे म्हणता येईल. एकदा चव घेऊन बघा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल!]

पत्ता: शाहूपुरी, ऍम्बेसेडर लॉजवळ

२. जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार..

पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ).

अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत...

ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड

तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड

अयोध्या >> कावळा नाका

राजधानी >> रुईकर कोलनी

सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे

शेतकरी धाबा >> फुलेवाडी

पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी

पर्ल >> सी.बी.एस. जवळ

**********************************************************************************************

पुणे

१. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०

झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.

मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile

पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.

२. आवारे लंच होम - पुणे ३०

चिकन/मटण थाळी.

सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्‍या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच.

पत्ता: अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल, जोंधळे चौक

३. निसर्ग [मासे]

पत्ता: कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला

४. गोमंतक

पत्ता: डेक्कन जिमखाना परिसर. पुनम हॉटेल च्या लगतच्या (उजव्या हाताला) इमारती मधे एकदम वरच्या मजल्यावर

५. मालवण समुद्र [मासे]

मोरी मसाला आणि भरलेले पापलेट.

पत्ता: पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी. चिंचवड टेल्को समोर. (टाटा मोटर्स)

६. हॉटेल आशिर्वाद, पुणे

मासे आणि कोळंबी थाळी साठी चांगलेच प्रसिद्ध आहे.

पत्ता: डेक्कन वरुन कुमठेकर रस्त्यावर या. सिटि प्राईड शुजच्या चौकात उजवीकडे वळा. उजवीकडची दुसरी इमारत.

गुरुवार बंद.

७. स्वराज्य

मालवणी जेवण खासच

पत्ता: टिळक रोड वरून, एसपी कॉलेजच्या चौकात, निलायम टॉकीजच्या दिशेने वळा.

निलायम टॉकीजच्या चौकात कुणालाही विचारा.

८. जनसेवा

९. जयश्री

१०. दुर्गा [बिर्याणि]

पत्ता: टिळक स्मारक मंदिरासमोरच्या बोळात आणि दुसरे मंडईत आहे कुठेतरी

११. कलकत्ता बोर्डिंग हाउस [मासे]

पत्ता: जंगली महाराज रस्ता

१२. कलिंगा [मासे]

मत्स्यावतारांसाठी बेष्ट... लाल करी अप्पम किंवा नीर डोसा याबरोबर झकास लागते.

पत्ता: नळस्टॉप चौकाच्या मागच्या बाजूला, जुने टेक महिंद्रा - शारदा सेंटर च्या समोर किंवा नवीन पर्सिस्टंट च्या बाजूला.

१३. हॉटेल सौंदर्य

मटण केशरी बिर्याणी

पुणेरी मटण (पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात. )

पत्ता: डेक्कनवर रानडे इन्स्टिट्युट समोर

ओरिजिनल, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील

१४. हॉटेल सर्जा [हे लता मंगेशकरांचे आहे.]

चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्‍यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्‍स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत.

"स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात.

(औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत)

पत्ता: "सर्जा रेस्तरॉं', 127-2 सानेवाडी, आयटीआय रस्ता, औंध,पुणे - 411007

१५. समुद्रा रेस्तरॉं

गोवन तसेच मालवणी पद्धतीने बनविलेले मासे व कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले पदार्थ.

मत्स्यप्रेमींसाठी इथे गोवन आणि मालवणी अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेले मासे.

फिश प्लॅटर

फिश करी

खिमा गोली पुलाव

पत्ता: म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे - 411052. 09422943742 (म्हात्रे पूल संपला, की डावीकडे वळून डीपी रोड)

१६. वाघोली गावातील हॉटेल कावेरी

बोल्हाईचे मटण

पत्ता: एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्‍याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे.

१७. दोराबजी अँड सन्स

इथे चिकन बिर्याणी जबरा

दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ

पत्ता: वेस्ट साइड शेजारचं आणि जुनं इस्ट स्ट्रीट वरचं

845, दस्तूर मेहेर मार्ग, सरबतवाला चौकाजवळ, पुणे 411001. 020-26145955, 020-26834595

१८. सिगरी रेस्तरॉ

कबाब, उत्तर भारतीय पदार्थ- अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब

पत्ता: "सिटी टॉवर्स' इमारत, ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.

वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ११

१९. "बोरावकेज बिर्याणी हाउस'

पाया सूप, मटण दालचा व राइस, चिकन खिचडा, चिकन दम बिर्याणी, रमजान स्पेशल चिकन, खिचडा, व्हाइट गोश, जंगबादी गोश, चिकन-मटण हंडी, चिकन-मटण मसाला, खिमा पराठा, चुल्हा मटण

पत्ता: 254, चिरंजीव अपार्टमेंट, शॉप न. 7, कर्वे रोड, कोथरूड, पुणे-411029, 020-25442279

२०. हॉटेल वाझवान

'ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत.

तबकमाझ, गुश्‍ताबा, मुर्ग याखनी, रवा, सर्वांत शेवटी- दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्‍मिरी खीर.

पत्ता: बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्‍लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की वाझवान.

२१. हॉटेल अभिषेक

पत्ता: म्हात्रे पूलाकडून संत गुळवणी महाराज चौकातून स्वप्नशिल्प सोसायटीकडे जाणारा रस्ता.

२२. चायनीज रूम

पत्ता: चायनीज साठी, कर्वे रस्त्यावरील

२३. ऑफ बीट

पत्ता: कर्वे रस्त्यावरून झाला कॉम्प्लेक्स च्या चौकात डावीकडे पिज्झा हट कडे वळालं (स्वप्नशिल्प सोसायटीच्या रस्त्याला/कोथरूड सिटिप्राईड थिएटर कडे) की उजव्या बाजूस आहे १ल्या मजल्यावर.

२४. हॉटेल सदानंद

पत्ता: कर्वे रस्त्यावरचं मॅक्डोनल्ड च्या आधी आहे, यांचचं पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर बाणेरपाशी दुसरं आहे.

२५. हॉटेल गुडलक

पत्ता: डेक्कन

२६. हॉटेल खैबर, हॉटेल पूनम

पत्ता: दोन्ही, डेक्कन

२७. हॉटेल निमंत्रण

पत्ता: बिबवेवाडी रस्त्यावरचं, पुष्पमंगल कार्यालयाजवळचं

२८. हॉटेल सृष्टी [मासे]

पत्ता: सदाशिव पेठेतलं.

टिळक स्मारक मंदिरासमोर एक रस्ता जातो पेरूगेट(पो.चौ.)कडे...

१. जर तुम्ही स.प महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजेच टिळक रस्त्याने आलात, अलका टॉकिजच्या दिशेने, तर तुम्हाला उजवीकडे वळता येणार नाही (टि.स्मा. चौकात)...

२. त्यामुळे स.प महाविद्यालयावरून थोडं पुढे आलात की डाव्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे त्याला लागूनच एक छोटी गल्ली टि. स्मा कडे जाते...त्यातून पुढे जा आणि उजव्या हाताला वळा, जसा रस्ता जातो तसं...मग तुम्ही आपोआप सिग्नल पाशी याल्...सिग्नल ओलांडून सरळ जा.

३. उजव्या हाताला दुर्गा हॉटेल आहे...त्याच लायनीत उजव्या बाजूलाच 'सृष्टी' आहे...सिग्नल पासून हार्डली १०० मी.

२९. हॉटेल कोयला [द हैद्राबाद हाउस]

हैदराबादी बिर्याणी, एकदम निजामी थाटाचं

पत्ता: कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड

३०. कोकण एक्स्प्रेस

पत्ता: कोथरुड, दशभुजा गणपती वरुन सरळ महर्षी कर्वे पुतळ्याकडे या[२किमी], दोन रस्ते फुटतात, डावीकडचा रस्ता घ्या, तेथुन १किमी वर आहे. रस्त्याला लागुनच आहे.

३१. मिर्च मसाला

पत्ता: इथली सोलकढी पण चांगली असते, कोथरुड

३२. न्यु मराठा कोल्हापुर दरबार

एकदम झकास मटण थाळी. सोलकढी खलास असते.

पत्ता: यांच्या पुण्यात दोन शाखा आहेत. एक सदाशिव पेठेत, ज्ञानप्रबोधिनी च्या समोरच्या बोळात आणि दुसरी मोरे विद्यालय बस-स्टॉप च्या थोड आधी.

३३. शीश महल

इराणी पध्दतीचे खाद्यपदार्थ मिळतात. चेलो कबाब विशेष छान. हवा असल्यास हुक्का पण मिळतो (निरनिराळ्या स्वादांमधे)

पत्ता: ए.बी.सी. फार्म्स, कोरेगाव पार्क

३४. सिंहगडावर जवळपास सगळे ढाबे (विशेष करुन बाळुचा ढाबा)

इथे मस्त पैकी गावरान चिकन आणि भाकरी हाणायची

३५. पुरेपुर कोल्हापुर

कोल्हापुरी पद्धतीने बनवलेल मटण

पत्ता: पेरुगेट पोलिस चौकीजवळ आणि दुसरे मेहेंदळे गैरेज जवळ, अभिषेक हॉटेल शेजारी, कोथरुड

३६. शेतकरी नॉनव्हेज

सुक्कं मटण , कडक भाकरी, खिमा फ्राय, पांढरा आणि तांबडा रस्सा

हवे असेल तर जोडीला सुरमई फ्राय.

तांबड्या रस्श्यात कडक भाकरी चुरून वरून सुक्के मटण हाणा इथे.

*[याची एक खासियत: लता मंगेशकर, आशा भोसले, श्रीकांत मोघे वगैरे सारखे मोठे लोक्स इथे जेवायला आले त्याचा एक छोटासा अल्बमही बघायला मिळेल.

आशा भोसलेंचा एक छानसा अभिप्राय सुद्धा वाचल्याचा आठवतोय.

तसेच, 'यहां शराब पीना मना है' सारख्या टिपिकल ढाब्याच्या सुचना ही .. Smile]

पत्ता: निलय कॉम्लेक्स शेजारील गल्ली, संतोष हॉल जवळ,

आनंदनगर, नरवीर तानाजी रस्ता,(सिंहगड रोड), पुणे.

३७. रानमळा

गरम गरम चुलीवरचे non veg मिळते.....khup sahi asate.....

पत्ता: चाफेकर चौकाजवल जो जकात नाका आहे , तिथुन सरळ गेल्यावर जो कच्चा रस्ता लागतो, तिथे आहे

३८. हॉटेल नागपुर

इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण

मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय.

पत्ता: टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे.

साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे.

हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक

दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे

पहात असलेले असतील!!!!!

३९. जंजिरा

एक मासे खाण्या साठी चांगले हॉटेल आहे..

पत्ता: अलका टॉकिज वरुन खाली गांजवे चौकात आला कि हे हॉटेल लागते....

४०. यज्ञकर्म उपहारगृह

चमचमीत निरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल

पत्ता: सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८.

१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला

'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.

२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)

३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्‍या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.

पत्ता इतका व्यवस्थित देवुनही चुकलात तर याद राखा. smiley

४१. मालवणी सोलकढी

पत्ता: कर्वे नगर मधे, 'मातोश्री' वृद्धाश्रमाच्या पुढे

४२. मल्लाका स्पाइस

पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी (थाई)

४३. बाँबे ब्राझरी

पत्ता: बोट क्लब रोडवर

४४. मेन लँड चायना

पत्ता: बोट क्लब रोडवर

४५. प्रेम्स

पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी

४६. ल मेरिडियन

इथलं 'अंगारे' (बहुतेक) हे भारतिय रेस्तराँ फारच जबरी आहे ... तंदुर प्रॉन्स तर एकदम जबरी ..

पत्ता: पुणे स्टेशनच्या मागच्या बाजुला.

४७.आर्थर्स थिम

पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी [फ्रेंच]

४८. चिंगारी

पत्ता: ए बी सी फार्म शेजारी, कोरगाव पार्क जवळ

४९. सिझलर्स साठी -

योको - ढोले पाटील रोड वर

झामुज - ढोले पाटील रोड वर

याना - फर्गुसन कॉलेज रोडवर

द प्लेस - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं

कोबे - लॉ कॉलेज रोडवर

द चार्कोल पीट - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं

५०. हॉटेल सिध्दगिरी

स्पेश्यालिटी: मटण भाकरी

लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी, [आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे], जेवण १ नंबर, म्हणून मापात टाकावी.

पत्ता: वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला.

५१. हॉटेल तोरणा विहार

कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जेवणासाठी जाणे

लईईईच्च भारी.

पत्ता: वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी

५२. फ्रेंड्स हॉटेल

जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे.

पत्ता: फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते.

त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण

५३. करी ऑन द रूफकॉन्टिनेंटल साठीपत्ता: प्रभात पो. चौ. समोरील. कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे.किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.

 

-- साभार गूगल

September 03, 2013

महागाई, कुपोषण आणि ऑलिम्पिकचे मेडल

दिल से (अच्युत गोडबोले)
महागाई, कुपोषण आणि ऑलिम्पिकचे मेडल  
भ्रष्टाचार हा आपल्या देशात आता इतका मुरलाय, की कोणालाच त्याचं काही वाटत नाही. एक नेता दुसर्‍यावर आरोप करतो तेव्हा दुसरा नेता मी कसा भ्रष्टाचारी नाही हे सांगण्यापेक्षा तू माझ्यापेक्षा कसा जास्त भ्रष्ट आहे, हे ओरडून सांगत असतो. मोठी गंमत आहे.
 
परवा फोर्ट परिसरात जी दंगल झाली ती अक्षम्य आहे, प्रश्‍नच नाही. म्यानमार कुठे आणि सीएसटी कुठे असं मी म्हणणार नाही. कुठल्याही गोष्टीचे पडसाद कुठेही उमटू शकतात. म्हणजे अमेरिकेने उद्या इराकवर कारण नसताना हल्ला केला आणि त्याचा निषेध करणार्‍या रॅली आपल्याकडे निघाल्या तर ते सुजाण मानवजातीचेच द्योतक असेल, पण हे सारं चांगल्या कारणासाठी, चांगल्या मार्गाने झालं पाहिजे. आपल्याकडे रॅलीला जे हिंसक वळण मिळालं त्याचं स्वरुप खूप भयानक होतं, हे बरोबर नाही.
 
क्रिकेट हा अगदी प्राचीन काळापासूनच श्रीमंतांचा खेळ मानला जात होता. आपल्या देशात हा खेळ आल्यानंतरही जमीनदार मौजमजा करण्यासाठी क्रिकेट खेळत. म्हणजे जमीनदार बॅटने बॉल टोलवायचे आणि नोकरांनी बॉल आणून द्यायचा, असं स्वरूप होतं असं म्हणतात. खेळांची परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. १० टक्के लोकांनी खेळायचं, त्यातून करोडपती व्हायचं आणि ९० टक्के लोकांनी फक्त टीव्ही बघत टाळ्या वाजवायच्या, अशी परिस्थिती कायम आहे.
 
लिम्पिकमध्ये आपण पाच मेडल्स पटकावली आणि आपल्या देशवासीयांचा ऊर अगदी अभिमानाने भरून गेला. खेळ हे क्षेत्र दुर्दैवाने आपल्या देशात श्रीमंतांसाठीच आहे. कोणत्याही खेळात जम बसवण्यासाठी, त्यासाठी लागणारं साहित्य विकत घेण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. ज्यांना हे शक्य आहे तेच या खेळात करीयर करण्याकडे वळतात. गरीब घरचे आईवडील आपल्या मुलांना खेळाच्या मैदानात उतरवत नाहीत, त्याचं हेच कारण आहे. खेळ खेळणं परवडत नाही. त्यातच आपल्या देशात पाणी नाही, महागाई प्रचंड आहे, कुपोषण आहे त्यामुळे तगडे, तंदुरुस्त खेळाडू हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. या मोजक्या खेळाडूंमधून सिलेक्शन होत असल्यामुळे थोडेच खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतात आणि त्यातले अगदी मोजके मेडल पटकावू शकतात.
 
----------
 
आपल्याकडची सुदृढता वाढली पाहिजे, हे जितकं खरं आहे तितकेच काही वेगळे मुद्दे पण आपण लक्षात घेतले पाहिजेत. एक उदाहरण देतो, कॅरम, बिलियर्डस्, गोल्फ हे तीनही खेळ. या तीनही खेळांमध्ये तंत्र सारखंच आहे फक्त अंतराचा फरक आ, पण गोल्फ हा अतिश्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखला जातो, बिलियर्डस् क्लबमध्ये खेळला जातो आणि कॅरम फक्त गणपती मंडळांपर्यंत मर्यादित राहिला. खेळांंचं सामाजिक आणि आर्थिक स्थान पाहिलं तर ही दरी मात्र मोठी आहे. कौशल्य प्रत्येक खेळाला तेवढंच लागतं. आपण मात्र पाश्‍चात्यांचे महागडे खेळ किती काळ खेळणार?
 
बातम्या आणि सनसनाटी
आजकाल बातम्यासुद्धा सनसनाटी असतील तरच दाखवल्या जातात. आरुषी मर्डर केस ही इतकी रंगवूून अगदी शेरलॉक होम्स स्टाईलने दाखवली जाते. शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या इतक्या प्रभावीपणे दाखवल्या जात नाहीत. आपल्या देशात पाणीटंचाई, महागाई, रोजगार, कुपोषण असे कितीतरी मुद्दे आहेत त्याच्या बातम्या का दाखवल्या जात नाहीत. कारण त्यात सनसनाटी काही नसते? हे समजण्याच्या पलीकडे आहे.
 
स्त्रीभ्रूण हत्या हे रॅकेटच
मधल्या काळात स्त्रीभ्रूण हत्यांची प्रकरणं वारंवार ऐकायला मिळत होती. मला वाटतं हे फार मोठं रॅकेट आहे. पुरुषप्रधान संस्कृती त्यामागे आहेच. पण त्यात कॉर्पोरेट इंटरेस्टही असावेत. गर्भलिंग निदान करणारी मशीन मोठ्या प्रमाणावर विकली जावीत, वापरली जावीत यासाठीही प्रयत्न होत असणार.
अर्थात यामध्ये समाजाला नुसतं सुशिक्षित नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या सुशिक्षित केलं पाहिजे. मुलगी म्हणजे पराया धन, हुंड्याचा खर्च आणि मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, इन्कमचा सोर्स हे जे काही गणित आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने रुजवलंय ते बदलंय, हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आयटीच्या क्षेत्रात येणार्‍या मुली कुठेही बौद्धिक बाबतीत मुलांच्या मागे नाहीत. खरंतर अमेरिकेसारख्या मोठमोठ्या शहरातही काही ठिकाणी मुलींचे पगार मुलांपेक्षा कमी आहेत. हेसुद्धा या पुरुषप्रधान संस्कृतीचंच लक्षण आहे.
 
टीव्ही नकोच
टीव्ही पाहणं हा एक तापदायक प्रकार झालाय. टीव्हीवर सध्या नटनट्यांच्या मुलाखती, क्रिकेट आणि राजकारण या व्यतिरिक्त काहीच नसतं. एखाद्या चित्रकाराच्या, नाटककारांच्या मुलाखती क्वचितच बघायला मिळतात. मनाला आनंद मिळवून देणारं, कलाप्रेमींसाठी असलेलं असंही दाखवलं पाहिजे.

ऊंचे लोग

समृद्ध जीवन म्हणजे नक्की काय ? 20 रुपयांत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीसाठी 200 रुपये मोजणं? 40 रुपयांच्या वांग्यांसाठी गाडीतल्या गाडीत बसून 100 रुपये देणं? की देवाच्या दानपेटीत एक हजाराची पत्ती टाकणं? समृद्धीचं जीवन जगणाऱ्यांचा हेवा कुणीच करू नये; तसा तो करायचं काही कारणही नाही; पण समृद्ध जगणं म्हणजे नेमकं काय, हेही कधीतरी ठरवावं लागणार आहे... 

बऱ्याच वर्षांनी कोणत्या तरी कारणानं मुंबईतल्या एका टोलेजंग हॉटेलात उतरलो होतो. अर्थात, एका संस्थेनं ते बुक केलं होतं. हॉटेलात जाताच वेटरनं तिथल्या व्यवस्थांविषयी आवश्‍यक असणारं ज्ञान भरभरून दिलं. अलीकडच्या खोल्या अत्याधुनिक सुखसोयींनी भरलेल्या आहेत. पूर्णपणे यांत्रिकीकरण झालंय. ज्याला ते समजतं, तोच खोलीचा आनंद उपभोगू शकतो. 

वेटरनं मेनू कार्ड समोर ठेवलं. माझ्याबरोबरचा सहकारी म्हणाला ः ""तुम्हाला औषध घ्यायचंय; थोडं खाऊन घ्या.'' 
आम्ही दोघांनीही मेनू कार्ड चाळायला सुरवात केली. मेनूकार्ड भलं मोठं आणि हॉटेलच्या तारांकित वैभवात भर टाकणारं होतं. पदार्थ आणि त्यांच्यासमोर लिहिलेले दर वाचून गरगरायला लागलं. बाहेर 20 रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली 180 रुपये, बाहेर 30-40 रुपयांना मिळणारं ऑम्लेट इथं 500 ते 800 रुपये, पावाचा तुकडा 100 ते 125 रुपये, चहा 200 रुपये... बाप रे बाप! पुढचं काही वाचवेनाच... 

मी माझ्या सहकाऱ्याला म्हणालो ः ""चला, बाहेर जाऊ'' आणि त्यांची संमती न घेताच आम्ही बाहेर पडलो. माझा सहकारी समजूत काढत होता. ""अहो, हॉटेलच्या भव्यतेनुसार दर ठरलेले असतात. कुणी कुरकुर करत नाही. आठवतं का, अमुक एका देशाचा अध्यक्ष इथं राहून गेलाय. अमुक मोठे उद्योगपती, संचालक, सीईओ, नट इथंच येत असतात. कुणी दराविषयी कुरकूर नाही करत...तसं करणं प्रतिष्ठेला शोभतही नाही. आपण तिथलीच सेवा घ्यायला हवी होती.'' 
मी म्हणालो ः ""तुम्ही म्हणता ते खंरही असंल; पण यातले बहुतेक जण कुणाच्या तरी पैशावर येतात इथं. यायला हरकतही नाही; पण 20 रुपयांचं पाणी 200 रुपयांना. तीच बाटली, तेवढंच पाणी; तसंच पॅकिंग...काय फरक आहे? मग पाचपट पैसे देणं म्हणजे मला थोडी उधळपट्टीच वाटते. नाहक उधळपट्टी...कुणीतरी आपलं बिल भरणार आहे, म्हणून मस्तीत केली जाणारी उधळपट्टी...'' 
आम्ही बाहेर गेलो. 100-200 रुपयांत दोघांनी खाऊन घेतलं. 20 रुपयांत पाण्याची बाटलीही आली. पुन्हा त्या प्रतिष्ठित हॉटेलात परतलो. सवलतीच्या दरात तिचं भाडं होतं दिवसाला 10 हजार रुपये... 

आपल्या देशातली दारिद्य्ररेषा आणि तिच्या खाली असणाऱ्या माणसाचं दरडोई उत्पन्न ठरवण्यावरून मोठमोठ्या विद्वानांत आणि सरकारमध्ये वाद सुरू आहे. कुणी म्हणतं दरदिवसा 30 रुपये, कुणी म्हणतं 40 रुपये. वाद काही मिटत नाही. एकाचं दरदिवसा दरडोई उत्पन्न म्हणजे दुसऱ्याचं एक वेळचं पाणी, असंही गणित मांडता येत नाही. कल्पना करा, एखाद्यानं या प्रतिष्ठित हॉटेलात राहून दिवसभरात पाण्याच्या तीन बाटल्या फस्त केल्या, तरी करासह 600 रुपये होतात आणि इकडं आख्ख्या कुटुंबानं 50-60 रुपयांत जगायचं आहे. वरच्या वर्गाचं उत्पन्न वाढलं, की तोच महागाईला निमंत्रण देतो. जास्तीत जास्त महागाई म्हणजे जास्तीत जास्त प्रतिष्ठा. एकतर यातले बहुतेक जण कुणाचे ना कुणाचे तरी पैसे उडवत असतात. त्यांचा पगारही जंबो असतो. महागाईवर ना कधी ते चर्चा करतात; ना कधी तिला विरोध करतात...महागाई कितीही तीक्ष्ण दातांची असली तरी त्यांच्यापर्यंत ती पोचतच नाही. त्यांच्याकडं कवचकुंडले असतात... 

परवा "मद्रास कॅफे' चित्रपट पाहायला गेलो होतो. बुकिंग विंडोजवळ बोर्ड लावला होता. सकाळच्या शोचं तिकीट होतं 120 रुपये, तर रात्रीच्या शोचं तिकीट होतं 220रपये! हा फरक का? चित्रपट तोच, जागा तीच, प्रत्येक शोवर वीज, एसी, तेवढाच खर्च होणार; मग एवढा फरक का? कुणाच्याच मनात असा प्रश्‍न निर्माण होत नाही. वरचे, मधले कुणीच याविषयी ब्र काढत नाहीत. बाहेर अतिशय उच्च दर्जाच्या लाह्या मिळतात 15- 20 रुपयांना. इथं त्या 160 रुपयांना. एवढा फरक का? कुणाच्याच ओठावर असा प्रश्‍न नसतो. याउलट "आपण एन्जॉय करायला येतो; महागाईचा अभ्यास करायला नाही,' असं समर्थन बरेच जण करतात. 10-20 पटींनी अधिक रक्कम देऊन एखादी गोष्ट विकत घेण्यात एन्जॉयमेंट कशी काय असते, हा एक न सुटणारा प्रश्‍न. 

कधीकधी मधले म्हणजे मधल्या वर्गातले लोक कुरकूर करतात; पण चित्रपट संपल्यावर. "तिकीट किती महाग आहे नाही? आणि बर्गरचे 150 रुपये लावले,' अशी त्यांची तक्रार असते. एक दिवस चित्रपटावर बहिष्कार टाकला, की सारं काही वळणावर येऊ शकतं; पण तसं कुणी करीत नाही. कॉलेजमध्ये गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांनी अतिशय चांगलं शिकवावं आणि तो आमचा हक्क आहे, असं विद्यार्थ्यांनी थोडं जरी मोठ्या आवाजात सांगितलं, तरी ट्यूशनची दुकानं बंद पडतील; पण तसं घडत नाही. उलट, कोट्यामध्ये लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून पोरं "आयआयटी'च्या तयारीला जातात. तिथल्या "दुकानदारां'नी प्रवेशावर निर्बंध आणले. ट्यूशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा सुरू केली. ती उत्तीर्ण व्हावी, यासाठी मग पुणे, मुंबई, नाशिकमध्ये नवी ट्यूशन सुरू झाली. तिलाही प्रचंड गर्दी. मग आता तिथं प्रवेश मिळावा म्हणून अजून कुणीतरी नवी शक्कल काढेल. खिचडी खाऊन शिकणारी पोरं ट्यूशनच्या दारात जाऊ शकत नाहीत आणि फी इतकी का वाढली, असा प्रश्‍न उच्च वर्गात जगणारा कुणी विचारत नाही. 

मला आठवतं, हातात पिशवी घेऊन रस्त्यावरच्या भाजीबाजारात एकदा उभा राहिलो होतो. माझ्या अगोदरच भाजीविक्रेत्यासमोर एका महिलेनं इम्पोर्टेड गाडी लावली. गाडीची काच खाली करून आणि गाडीत बसूनच ती भाजी खरेदी करू लागली. मोठी मजेशीर रीत होती तिची. "वोह बैंगण एक किलो दो... फ्लॉवर, कोबी प्रत्येकी एक किलो' अशी ऑर्डर ती देत होती. विक्रेत्यानं साऱ्या गोष्टी पॅक केल्या. खिडकीशेजारी तो उभा राहिला. पुढच्या सीटवर थैली ठेवत तो म्हणाला ः ""मॅडम, 700 रुपये!'' मॅडमनं पटकन 700 रुपये दिले. 100 रुपयांची टीपही दिली. बंदुकीची गोळी सुटावी, तशी तिची गाडी सुटली. मी भाजीसाठी थांबलो. "वांग्याचा दर काय?' "कोबी कसा?' असे प्रश्‍न विचारू लागलो. विक्रेत्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला ः ""मॅडमकडून जो दर घेतला, तोच तुमच्याकडून घेईन. एक पैसा जादा घेणार नाही.'' 

मी म्हणालो ः ""वांग्याचा दर काय लावला?'' 
तो म्हणाला ः ""फार नाही; 100 रुपये.'' 
मी म्हणालो ः ""वांगी तर 70- 80 च्या भावानं विकली जात आहेत.'' 
तो म्हणाला ः "होय, माहितीय मला; पण मॅडमनं आत्ताच नवा दर फोडला. 100 रुपये किलो. बघा परवडतं का?'' 




कुणाच्याही लक्षात यायला हरकत नाही, की आता जगाचे सरळसोट दोन तुकडेच झाले आहेत. वरचा तुकडा बिनधास्त जगतोय. महागाई कशाला म्हणतात ते तो गुगलवर, ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीत पाहतोय. खालचा तुकडा घालमेल होऊन महागाई पचवण्याचा प्रयत्न करतोय. महागाई का वाढते, याचं कारण त्याला कळत नाही. त्याचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून सरकार महागाईला लगाम घालण्याऐवजी सबसीडीचे नवे मार्ग शोधायला लागतं. खिचडीपासून अन्नसुरक्षा विधेयकापर्यंत कोणतेही मार्ग यात असू शकतात. या मार्गावर जगण्याची व्यवस्था होईल कशीतरी; पण लढण्याची आणि विकासाची व्यवस्था होत नाही कधी...एखाद्यानं महागाईला कंटाळून आत्महत्या केली, की त्याला कसलीच भरपाई मिळत नाही आणि मिळाली तरी मरणानंतर तिचा काय उपयोग? 

समृद्ध जीवन जगणाऱ्यांचा हेवा कुणीच करू नये. तसं करायचं काही कारणही नाही; पण समृद्ध जगणं म्हणजे नेमकं काय, हेही कधीतरी ठरवायला हवं. 

20 रुपयांचं पाणी 200 रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? 40 रुपयांची वांगी गाडीत बसून 100 रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? की अशा चढ्या आलेखातून पिळवणूक होतेय, असा प्रश्‍न कधीच न विचारणं म्हणजे समृद्ध जीवन? 

रस्त्यावर कुठंही संत्री, सफरचंद खरेदी करा. तुम्ही गाडीतून उतरलात तर महागाई भडकते...तुम्ही मौन पाळून व्यवहार केलात, तर ती आणखी भडकते आणि भडकत्या वस्तूत प्रतिष्ठा आहे, असं समजून बसाल, तर ती आणखी आणखी भडकते. आपल्याला त्याच्या झळा बसणार नाहीत कदाचित; पण तुमच्या मागून जो चालत येतो आहे, महिन्याचं अंदाजपत्रक पाठ करत येतो आहे, त्याला मात्र त्या झळा बसणार आहेत, हे विसरायचं का आपण? खरं म्हणजे मागून येणाऱ्याचा दोष काहीच नाहीय. दोष एवढाच, की तो वरच्या वर्गामागं उभा आहे. 

माझा एक मित्र देवदर्शनासाठी रांगेत उभा होता. त्याच्या पुढं वरच्या वर्गातला एक भक्त उभा होता. दर्शन झाल्यानंतर त्यानं दानपेटीत हजाराची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं खूृश होऊन त्याला देवाचा स्पर्श झालेला नारळ दिला. आशीर्वाद दिला. माझ्या मित्रानं मात्र दर्शन झाल्यावर पाच रुपयांची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं तेही बघितलं आणि तो पुटपुटायला लागला ः ""पुढची माणसं कशी श्रद्धा व्यक्त करतात बघावं, रीत पाळावी...'' 
वगैरे वगैरे... 
वरच्यानं दानपेटीचा भावही वधारून ठेवला होता. मित्र शरमिंदा होऊन मागं परतला. त्याला त्याच्या दारिद्य्राची लाज वाटू लागली. 
मी म्हणालो ः ""नाराज कशाला होतोस आणि वरच्या वर्गात जाऊन त्यांच्यासारखं वागण्याची खोटी स्वप्नं का बाळगतोस? तुलाही हजार रुपये टाकायचे होते का? लक्षात ठेव, देव नावाची शक्ती कुणाकडं काहीच मागत नसते. हे वरचे लोक देवासह-माणसासह सर्वांनाच अशा काही ना काही सवयी लावतात... श्रद्धेत नव्हे; तर हजाराच्या पत्तीत प्रतिष्ठा आहे, असं सांगतात...'' 

मध्यंतरी वरच्या वर्गाची व्याख्या करणारी एक जाहिरात कुठल्या तरी मसाला गुटखा तयार करणाऱ्या कंपनीनं बनवली होती. उत्पादन खायचं आणि थुंकत फिरायचं. ऊंचे लोगों की कसली तरी पसंत, असं त्या जाहिरातीचं नाव होतं. एक पुडी तोंडात टाकली, की जणू काही अमिताभ बच्चनएवढी उंची प्राप्त होणार...! मग अशा जाहिरातीत काम करण्यासाठी नट-नट्याही पुढं येऊ लागल्या. आपली आर्थिक उंची वाढवू लागल्या... 

आपण वरचं जगत असताना खालच्याचं विनाकारण नुकसान करतोय...अशा खालच्या वर्गाचं, की ज्यानं या वरच्या वर्गाला विरोध केला नाही. आपण कितीही वर गेलो, तरी आपले पाय कुणाच्या तरी खांद्यावरच असतात. आपलं वरचं स्थान तोपर्यंतच टिकून राहतं, जोपर्यंत हे खांदे हलत नाहीत, उठाव करीत नाहीत, प्रश्‍न विचारत नाही... कुणी सांगावं, कोण्या एका क्षणाला या खांद्यांतूनही फुटतील प्रश्‍न...

- उत्तम कांबळे uttam.kamble@esakal.com