February 11, 2008

बाप

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.

जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.


मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.

आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना?


कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?

वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते.

मुळ लेख....

बाप

February 10, 2008

आई

आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढेशब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपतनाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शालआता यावीत दु:खे खुशाल.......
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........