March 01, 2011

थांब (संदीप खरे)

एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त् याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थांबते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही!
 
हा लेख वाचण्यापूर्वी विनंती आहे की, प्रथम याच्या सोबत असलेली कविता आधी वाचावी...आणि तीही मी सांगतो तशी वाचावी. प्रथम "तो'ची कविता वाचावी आणि मग लगेचच " ती'ची कविता!

कवितेचा अगदी वेगळा आकृतिबंध उलगडणारी ही हेमंत जोगळेकर यांची कविता. एकच घटना दोघांच्या दृष्टिकोनातून मांडलेली! आकृतिबंधाच्या दृष्टिकोनातून तर ही कविता मला वेगळी वाटतेच; पण कवितेचा आशयही शब्दात मांडायला अतिअवघड असा! कोण आहेत हे दोघं? ज्याला आपण पौगंडावस्था म्हणतो, त्या वयाच्या आसपासचे हे दोघं...शेजारी शेजारी राहणारे, लहानपणापासून एकत्र खेळणारे, भांडणारे असे! मैत्रीचं हे निर्व्याज नातं; पण वय बेटं आता वाढतं आहे! मुलांपेक्षा मुली लवकर मोठ्या होतात, असं म्हणतात. फक्त मानसिकदृष्ट्याच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही, ताकदीनुसारही त्या झपाट्यानं मोठ्या होतात. मुलांची वाढ सर्वच दृष्टीने हळू! आणि म्हणून बदललेल्या संवेदना, आकलन मुली जितक्‍या झटकन टिपतात, तितकी मुलं टिपू शकत नाहीत!

या कवितेतली ही मुलगीही अशी नुकतीच वयात येऊ लागलेली. तिला स्वतःला हे बदल जाणवू लागले आहेत. आईनेही "आता यापुढे...' असं म्हणून अनेक सूचना दिलेल्या आहेत. "असं अजागळासारखं बसायचं नाही' पासून ते "मुलांशी दंगामस्ती करायची नाही', "कुणी काही देतो म्हणून बोलावलं तर उगीच जायचं नाही,' "शाळा सुटल्यावर तडक घरी यायचं; सं ध्याकाळचं रेंगाळायचं नाही उगीच!'पर्यंत... हे सारं तिच्या डोक्‍यात आहे. मोठेपण खुणावतंय आणि बालपण हात धरून अजून मागं खेचतंय! आणि म्हणूनच तर त्यानं "कुस्ती खेळू या' म्हटल्यावर आधी "नाही, नाही' म्हणत का होईना पण ती तयार झाल्येय! एकाच वयाचे आहेत दोघं...पण तो तिच्यासमोर थोडा किरकोळ, शक्तीत थोडा कमी असा! आणि हे ठाऊक आहे तिला! कुस्तीला तयार झाली ती "नाही, नाही' म्हणत; पण एकदा कुस्ती सुरू झाल्यावर मात्र भारी पडते आहे ती त्याला! तिचा जोर एवढा आहे की, हाप्पॅंटमधल्या त्याच्या लुकड्या तंगड्या थरथरायला लागल्या...श्‍वास गरम झाले...डोळे कोपऱ्यात गेले! अजून थोडा नेट आणि तो हरणार...मुलगा असून एका मुलीकडून कुस्तीत हरणार? सहन होत नाहीए त्याला; पण बळ कमी पडतंय...दात-ओठ खाऊन त्याचा पुरुषी अहंकार जोर लावतोय! अजून थोडा नेट आणि तो हरणार, हे तिला जाणवत होतं...पण निश्‍चित झाल्याक्षणी ती एकदम म्हणते ः "थांब!' कुस्ती थांबत, कुणीच जिंकत नाही, पण मुख्य म्हणजे तो "हरत' नाही! अचानक आलेलं हे "थांब' आलं कुठून?
 
मला वाटतं की, सदैव अनाकलनीय राहिलेल्या स्त्रीतत्त्वातून हे योग्य वेळी सुचलेलं "थांब' आलं असावं! आदिकाळापासून हे स्त्रीतत्त्व कोडं म्हणून उभं आहे! "तगून' राहण्यासाठी जे जे लागतं, ते ते सारं निसर्गानंच तिच्या ताब्यात दिलं आहे. फक्त निर्मिती नव्हे; तर स्वतः तगून इतरांचं पालनपोषण करण्याचं अफाट सामर्थ्य तिच्या ठाई आहे! "गॉन विथ द विंड'म धली नायिका स्कार्लेट ओ हारा; अनेक विपत्ती तिच्यावर येतात...चहूबाजूंनी समस्या...घर-दार दुरावतं, प्रेम दुरावतं, माणसं दुरावतात आणि अशाच एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते ः "मी अशी हरणार नाही...मी इथे टिकून राहीन..' जगण्यातली सारी झुंज तिच्यात एकवटते! या तथाकथित "पुरुषप्रधान' जगात आपण कितीदा तरी पाहतो की, आपत्तीच्या काळात पुरुष कोलमडतो...पण हळव्या, नाजूक मनाच्या स्त्रिया मात्र ताठ उभ्या राहतात; नव्हे, त्यालाही हात धरून उभ्या ठेवतात! बुद्धी, सौंदर्य, कौशल्य, कारुण्य, कोमलता, प्रसंगी कठोरता, सोशिकता आणि परिस्थितीची जबरदस्त अंगभूत समज...या साऱ्यांतून ती जगण्याचा, अस्तित्वाचा आधार बनून उभी राहते - कधी आई म्हणून, कधी बायको म्हणून, कधी बहीण, कधी मैत्रीण, कधी प्रेयसी म्हणून! आणि या साऱ्याच्या पार तिला जे कळतं, ते पुरुषांना कधीही न उमगणारं! तिला कळतं की जिंकता येतं म्हणून दर वेळेला जिंकायचंच, असं नसतं!! खरं तर आपल्यावरच अवलंबून असलेल्या "त्या'च्या मधला तो पुरुषपणाचा अहंकारही प्रसंगी हार खाऊनही ओंजळीतल्या दिव्यासारखा जपायचा असतो! सामर्थ्याच्या अंतरंगातला हा प्रेमाचा, वात्सल्याचा सोशिकतेचा हळुवार झरा पुरुषी मनाला कसा उमगणार?! एका साध्याशा प्रसंगाच्या निमित्तानं दोघांच्या मूळ प्रवृत्तींविषयी ही कविता केवढं बोलते! जगताना नकळत आपण जे अनेकदा अनुभवतो, ते असं ती वेचून दाखवते! तो हरणार हे त्याला कळलेलं...ती जिंकणार हे तिला कळलेलं..पण कुस्ती थां बते...नव्हे ती थांबवते...आणि मग त्यावर काही चर्चादेखील होत नाही! त्याचं झगडणं, जिंकण्यासाठीची तडफड, अहंकार ती अलगद तिच्या केवळ स्त्रीलाच शक्‍य अशा अवधानाच् या, मोठेपणाच्या ओंजळीत घेते! स्त्रियांना आईपणाचं वरदान असतं म्हणू त्या अशा असतात; की स्त्रिया अशा असतात म्हणून देव त्यांना आईपणाचं वरदान देतो?