December 10, 2008

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ईमेल

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री। अशोकराव चव्हाण यांनी जनतेच्या संपर्काकरता स्वत:चा वैयक्तिक ईमेल आयडी जाहीर केला आहे. शासन, प्रशासनसंबधातील जनेतेचे प्रश्न त्यांनी यावर मांडण्याचे आवाहनही केलेले आहे.
त्यांचा ईमेल- ashokchavanmind@rediffmail.com
यावरून असे दिसते की नवीन मुख्यमंत्री नक्कीच उच्च विद्याविभूषित आहेत .

December 01, 2008

रक्त दाना बद्दल उपयुक्त संकेत स्थळ

जर तुम्हाला रक्त हवे असेल तर हे पहा - www.friends2support.org
आणि
www.bharatbloodbank.com/
इथे तुम्हाला हवा असलेला रक्त गट नक्की मिळेल
आणि तुम्ही सुद्धा या संकेत स्थला चे सदस्य व्हा.

November 01, 2008

पु. लं.अखेरचा प्रवास

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख --


'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली ' दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊनये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ...
त्यानंतर काही वरिष्ठडॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.

अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊलागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?
नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...

आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....

October 25, 2008

बिग़ बँग...

फक्त सव्वा महिना राहिला! देवानं बसवलेली पृथ्वीची मूर्ती शास्त्रज्ञांनी नाही विसर्जित करायची तर कुणी? फ्रान्सजवळ खणलेल्या त्या कसल्याशा बोगद्यात कुठलेसे दोन कण एकमेकांवर आपटल्यानंतर जगबुडी होणार आहे म्हणे. खरंच! "इंडिया टीव्ही'शप्पथ! "क्‍या राहू-केतू के क्रोध से होने वाले प्रलय से बच पायेगी धरती मॉं?' ......
या सवालाचा जवाब राहून राहून "नाही' असाच येतोय. आम्हीही आमच्या पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. एक तर (दंड भरून) आम्ही आमच्या सर्व विमा पॉलिश्‍या रद्द करवून घेणार आहोत. नोव्हेंबरात टाकलेली रजा ऑक्‍टोबरातच घेणार आहोत. किंबहुना मिळेल तेवढी रजा आणि पॉलिश्‍यांचे मिळतील तेवढे पैसे घेऊन जमल्यास स्वित्झर्लंड (नको! नको! तो बोगदा तिकडंच आहे!), किंवा सेशेल्स किंवा मॉरिशस, किंवा केरळ किंवा गोवा, अगदी कुठंच न जमल्यास महाबळेश्‍वरला जाऊन "ऐश' करण्याचा विचार आहे. गेल्या काही दिवसांत त्या "होम लोन'च्या वाढत्या हप्त्यामुळं आमचा जीव हप्त्या-हप्त्यानं चालला होता. आता पुढच्या महिन्यात आम्ही हप्ता देणारच नाही! बस म्हणावं... फारच तगादा लावला, तर देईन चेक २२ ऑक्‍टोबरचा... पोस्ट डेटेड! यंदा दिवाळी दिसेल असं काही वाटत नाही... तेव्हा आम्ही नवरात्रातच दिवाळीची भरपूर खरेदी उरकणार आहोत. दसऱ्याच्या दिवशीच भरपूर फटाके उडवून घेणार! त्या "टायटॅनिक'वर नव्हते का उडवत उंच उंच रॉकेट... मरतानाही कसं "सेलिब्रेशन' करीत जावं...

२१ ऑक्‍टोबरला चॅनेलवाले कसं वार्तांकन करतील? ज्याला त्याला गाठून "तुम्हे आज कैसा महसूस हो रहा है...?' हाच प्रश्‍न विचारतील की बदल म्हणून "अब आप के आगे के प्लॅन क्‍या है?' असं विचारतील? पृथ्वीची अवस्था साधारण कशी होईल, यावर "एसेमेस' मागवता येतील का? १. आग लागेल, २. समुद्र दोन मीटर वर येईल, ३. धूमकेतू-उल्का येऊन आदळतील... असे तीन "ऑप्शन' देता येतील. आणि हो, पेपरवाले, दूधवाले, केबलवाले २० तारखेलाच पैसे न्यायला येतील का? त्यांना काय सांगायचं? कसं कटवायचं?

अहो, त्या शास्त्रज्ञांना कुणी तरी जाऊन सांगा! आम्हाला अजून जगायचंय! तुमचं तुमच्या पॉलिशीवाल्याशी भांडण झालंय का? पण मग सगळ्या पृथ्वीच्या जिवावर का उठता? आमच्या अंगाचा संताप संताप झाला. त्वरित आम्ही २० ऑक्‍टोबरचं जिनिव्हाच्या विमानाचं बुकिंग केलं. (पॉलिसीचे पैसे आले ना!)

सिक्‍युरिटी तोडून आम्ही त्या शास्त्रज्ञांच्या अड्ड्यावर पोचलो. हा सेट पूर्वी कुठं तरी बघितल्यासारखा वाटत होता. अरे हां! "मि. इंडिया'त मोगॅंबोचा दरबार अगदी अस्साच होता! आम्ही जाऊन त्या मुख्य शास्त्रज्ञाची दाढी धरली... आणि आणि... त्याला मारणार तोच... हे काय... आम्हालाच हे दणके कोण घालतंय? साक्षात मातुःश्री! "ऊठ बाळा... गॅस संपलाय... लवकर नंबर लावायला जा...' गजर झाला... आम्ही निमूटपणे उठलो... ती २२ ऑक्‍टोबरची सकाळ होती...

July 20, 2008

२ मिनीटे शांतता

काल मला एक -मेल आला तो वाचून खरच विचारात पडलो.......

February 11, 2008

बाप

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.

जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.


मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.

आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना?


कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?

वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते.

मुळ लेख....

बाप

February 10, 2008

आई

आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढेशब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपतनाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शालआता यावीत दु:खे खुशाल.......
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........

January 11, 2008

क्षत्रिय कुलावंतस...........

प्रौढ़ प्रताप पुरंधर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज...........